आंब्याची फळगळ

आंब्याची फळगळ

मूळची कोकणातील, आमच्या ऑफिस मधील पायलच्या डब्यात नेहमीच नवनवे पदार्थ असतात आणि त्या पदार्थांची नावेही एकदम नवीन असतात. आत्ता मार्चच्या मधल्या आठवड्यात तिने कैरीचे लोणचं आणलं होत. आम्ही म्हटलं वा ताज्या कैरीचं लोणचं दिसतय. त्यावर तीच म्हणणं होत "आम्ही टपकू कैरीचं लोणचं म्हणतो"  त्यांच्या पुण्यातील घराजवळील आंब्याच्या गाळलेल्या कैऱ्यांचे लोणचं. जमिनीतील पोषण द्रव्ये, पावसाळ्यात झालेला पाऊस, कैऱ्या लागल्यानंतर आलेले, ढगाळ वातावरण, वादळ  आणि ऊन या मुळे काही प्रमाणात कैऱ्या गळणे नैसर्गिक आहे. कोकणात व्यावसायिक बागांमध्ये काही रासायनिक औषधे फवारून फळगळ नियंत्रणात ठेवतात. पण नैसर्गिक ते नैसर्गिकच ना...           

नव्यानेच लावलेल्या साधारणतः तीन ते चार वर्षाच्या कलमी आंब्यांना पहिल्यांदाच मोहोर लागतो तेंव्हा आपणासर्वांनाच आनंद होतो . प्रत्यक्षात किती फळधारणा होणार हे मात्र मोहोर लागलेल्या फांद्यांचे किती पोषण झालंय यावर अवलंबून असते. बऱ्याच वेळेला अशक्त फांद्यांना आलेला मोहोर नैसर्गोकरित्या गाळून जातो. ती फांदी किती वजन सहन करू शकते तेवढ्याच कैऱ्या राहतात. अशा  नव-तरुण आंब्याचा ५०% मोहोर गळणे नैसर्गिक आहे. आमच्याकडे गावी असा अशक्त फांद्यांना आलेला मोहोर खुडून टाकण्याची पद्धत आहे. खुडलेल्या मोहोराच्या जागी नवीन फुटवा लगेच येतो. पुढील वर्षभर तो फुटावा पोसला जातो  आणि पुढच्या हंगामात जास्त फळे लागतात.

आंब्याच्या कलामांना अधिकाधिक पोसण्यासाठी आणि उत्तम फळधारणेसाठी सर्वोत्तम सेंद्रिय उपाय म्हणजे झाडाचे वय जेवढे तेवढे किलो सेंद्रिय खताचे मिश्रण  झाडाला दोन हप्त्यात मिळाले पाहिजे. उदाहरणार्थ एका वर्षाच्या कलमाला एक किलो, पाच वर्षाच्या कलमाला पाच किलो आणि दहा वर्षाच्या आणि त्यावरील वरील कलामांना प्रत्येकी दहा किलो खत दिल्यास फळधारणेसाठी कलमाची सुयोग्य वाढ होते. या मिश्रणात कंपोस्ट, शेणखत, बोन मिल आणि वेगवेगळ्या तेलाच्या पेंडी असाव्यात.

हे खत दोन हप्त्यात रिंग पद्धतीने द्यायचे असते. पहिला पाऊस पडल्यानंतर लगेच पहिला हप्ता. खताच्या या हप्त्यामुळे नवीन फ़ांद्या तयार होणे आणि आधीच्या फांद्या मजबूत होण्यास मदत होते. दुसरा हप्ता दिवाळीच्या नंतर मोहोर लागण्याच्या आधी द्यायचे असते. याचा फायदा मोहोर आणि फळधारणेसाठी होतो. रिंग पद्धतीने म्हणजे आंब्याचा जेवढा घेर आहे त्याच्या बरोबर खाली गोलाकार, सहा ते नऊ इंची खोल खड्डा करून त्यात हे खत सर्वत्र सारख्या पद्धतीने टाकणे आणि नंतर ती रिंग पालापाचोळ्याने भरून टाकणे. या उपायाने फळधारणा टप्प्या टप्प्याने वाढते आणि कलामांचे आयुष्य पण वाढते.

मंदार वैद्य
*वरील लेख सम्यक ग्रीनच्या हिरवा कोपरा या ब्लॉगपोस्टवर पूर्वप्रकाशित आहे*         
 
       

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?